शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते जसे की २००४ ते २००७ जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळाला. पण किती जणांनी तो खिशात घातला? फारच थोड्यांनी. कारण आपण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही.उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो.आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातलं बरंच काही कळत. पण खरंच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.(आणि ज्यांना खरंच शेअर बाजारातील कळतं त्यांचेसाठी या साईटची गरजच नाही).आपल्याकडे पुरेसे रिसर्च नसते. मार्केट टायमिंग बरेच वेळा चुकत. अशी अनेक कारण असतात आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त जणांना नुकसानच होते.
डे-ट्रेडिंग - नकोरे बाबा - खरं म्हणजे अजिबात करू नये. तो एक जुगारच आहे. आणि जुगारात किती जणांना बरं पैसे मिळाले आहेत. मी तर वरील सर्व गोष्टी करून बसलो आहे. भरपूर नुकसान सोसले. शेवटी म्युच्युअल फंडच आपल्यासारख्या सामान्य लोकांना फार चांगला. ज्यांनी एका चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत ग्रोथ ऑप्शनमध्ये डिसेंबर १९९५ पासून दरमहा रुपये एक हजार मात्र गुंतवले आहेत आज त्याची व्हॅल्यू आहे २३ लाख रुपये.
एक मात्र लक्षात ठेवा म्युच्युअल फंडाचे समभाग संबधीत योजनेत पैसे गुंवताना दीर्घ काळासाठीच गुंतवणूक करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होवू शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्यायनिवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे.
मात्र जर आपणाला अल्प काळासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर म्युच्युअल फंडाचे कर्ज रोख्यांचे योजनेत (डेट फंड) गुंतवणूक करा. यात अगदी २ दिवसापासून ते दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी या योजनेत फक्त व्याज दराची व पत बदलाची जोखिम असल्यामुळे ती अत्यल्प असते.